आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष (IYOM) – 2023

मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष (IYOM) म्हणून घोषित केले आहे.

तृणधान्ये : तृण कुळातील (ग्रॅमिनी) वनस्पतींच्या पोषणक्षम बियांना तृणधान्य ही संज्ञा आहे. त्यांची लागवड मुख्यत्वेकरून त्यांच्या पिष्टमय बियांसाठी केली जाते. तृणधान्यांचा उपयोग मनुष्याच्या पोषणासाठी, जनावरांच्या खाद्यांत आणि औद्योगिक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या स्टार्चासाठी केला जातो. गहू, भात, मका, राय, ओट, सातू, ज्वारी आणि ज्वारी वर्गातील पिके, बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी यांचा तृणधान्यांत समावेश होतो. यांतील बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा व बंटी ही बारीक तृणधान्ये (मिलेट) आहेत. काही शास्त्रज्ञ ‘मिलेट’ हा शब्द दुय्यम प्रतीच्या तृणधान्यांसाठी वापरतात आणि गहू, भात, राय, ओट व सातू यांखेरीज सर्व तृणधान्यांचा समावेश त्यांत करतात. सर्व तृणधान्ये वर्षायू (एक वर्ष जगणारी) आहेत. गहू, राय, सातू व ओट ही पिके जगातील थंड हवामानाच्या प्रदेशांत आणि इतर सर्व पिके उष्ण अगर समशीतोष्ण भागांत होतात.

तृणधान्यांपासून मनुष्याला इतर दुसऱ्या कोणत्याही पिकापेक्षा अन्नाचा जास्त पुरवठा त्यांतील कार्बोहायड्रेटांमुळे होतो. तुलनेने शरीरपोषणासाठी कमी खर्चात जास्त कॅलरी (ऊर्जा) तृणधान्यांतून मिळतात. गहू, भात व त्याखालोखाल मका या तीन धान्यांवर जगातील पुष्कळसे लोक आपली उपजीविका करतात. बाकीचे लोक मका, राय, सातू, ज्वारी आणि बारीक तृणधान्ये यांवर उपजीविका करतात. जनावरांना चारा व खाद्य यांसाठीही तृणधान्यांना फार महत्त्व आहे. औद्योगिक उत्पादनात त्यांचा उपयोग विशेषेकरून जास्त उत्पादनाच्या देशांत स्टार्च, डेक्स्ट्रोज, गोड पाक (सायरप), खळ, खाद्य तेले आणि औद्योगिक अल्कोहॉल तयार करण्यासाठी होतो.
गहू: जगातील एकूण उत्पादनाच्या दृष्टीने हे सर्वांत महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील सु. निम्म्या लोकांच्या आहारात कमीजास्त प्रमाणात गव्हाचा वापर होतो. गव्हाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यातील विशिष्ट प्रकारच्या प्रथिनांमुळे चांगल्या दर्जाचा पाव तयार करता येतो. गव्हाखेरीज फक्त रायचा पाव करण्यासाठी उपयोग करतात परंतु तो पाव चांगल्या दर्जाचा नसतो. भात आणि इतर तृणधान्यांपेक्षा गव्हात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. गव्हाचा स्टार्च कपड्यांना लावण्यासाठी विशेष चांगला असतो .
भात : हेही जगातील फार महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील सु. ६०% लोकांच्या नेहमीच्या आहारात भाताचा समावेश होतो. त्याच्या एकूण क्षेत्रापैकी ९३% क्षेत्र पूर्व आणि आग्नेय आशियातील देशांत आहे. चीन वगळता जगातील भात पिकविणाऱ्या देशांत भारताचा, क्षेत्र आणि उत्पादन याबाबतींत प्रथम क्रमांक आहे .
मका : गहू व भात यांच्याखालोखाल हे जगातील महत्त्वाचे तृणधान्य आहे. जगातील जवळजवळ सर्व देशांत ते पिकविले जाते. सर्वांत जास्त क्षेत्र अमेरिकेतील संयुक्त संस्थानांत आहे. त्याचप्रमाणे ब्राझील, मेक्सिको, भारत, अर्जेंटिना आणि द. आफ्रिका या देशांतही मक्याखालील क्षेत्र बरेच आहे. समुद्रसपाटीखालच्या प्रदेशापासून ते ४,००० मी. उंचीपर्यंतच्या जगाच्या निरनिराळ्या भागांत आणि हवामानांत ते पिकविले जाते, हे या पिकाचे वैशिष्ट्य आहे. सर्व तृणधान्यांत संकरित मक्याचे हेक्टरी उत्पादन जास्त असते. स्टार्चाचा निरनिराळ्या औद्योगिक उत्पादनांसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. उदा., कापड आणि कागद उत्पादनांत लागणारी खळ, आसंजक (चिकटविण्यासाठी वापरण्यात येणारा डिंकासारखा पदार्थ), मद्ये. तृणधान्यात तेलाचा अंश फार अल्प प्रमाणात असतो, परंतु मक्यापासून पुरेशा मोठ्या प्रमाणावर तेलाचे उत्पादन होते
सातू : हे फार पुरातन काळापासून लागवडीत असलेले तृणधान्य आहे. ते सर्वांत पुरातन तृणधान्य आहे असे काहींचे मत असून ५,००० ते १०,००० वर्षांपूर्वीपासून ते लागवडीत असावे असे मानतात. ऋग्वेदात त्याचा उल्लेख यव असा केलेला आढळतो. भारतात उ. प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा व राजस्थानात या पिकाची लागवड मनुष्याच्या खाद्यान्नासाठी करतात. सातूचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळून त्याच्या रोट्या करतात. तसेच त्यापासून बिअर आणि व्हिस्की ही मद्ये तयार करतात .
ज्वारी : हे तृणधान्य ईजिप्तमध्ये इ. स. पू. २,००० वर्षे लागवडीत होते. याची लागवड आफ्रिका, भारत, चीन, मँचुरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि इतर अनेक देशांत केली जाते. भारतात भातानंतर मनुष्याचे अन्नधान्य म्हणून ज्वारीच्या क्रमांक लागतो. भारतातील ज्वारीच्या क्षेत्रापैकी ३४% क्षेत्र महाराष्ट्रात आहे .
बाजरी : हे बारीक तृणधान्य भारत, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील काही देशांत पिकते. भारतात ते ज्वारीच्या खालोखाल महत्त्वाचे असून त्याची लागवड विशेषेकरून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब आणि मध्य प्रदेशात होते. ज्वारीपेक्षा बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते
नाचणी : (नागली). दुर्जल शेतीसाठी सर्वांत चिवट असे हे गरीब लोकांचे बारीक तृणधान्य आहे. ते सर्व प्रकारच्या जमिनींत येणारे त्याचप्रमाणे जिरायत आणि बागायत पीक आहे. कर्नाटक राज्यात हे महत्त्वाचे पीक असून जवळजवळ भाताइतके क्षेत्र तेथे या पिकाखाली आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. ते पौष्टिक आणि शक्तिदायक समजले जाते आणि त्यात प्रथिने व कॅल्शियम पुष्कळ प्रमाणात असतात. मधुमेही लोकांना ते उपयुक्त समजले जाते. या धान्याचा विशेष म्हणजे साठवणीमध्ये ते इतर तृणधान्यांपेक्षा अनेक वर्षे न किडता टिकते .
वरी : हे लवकर पिकणारे व रुक्षताविरोधक (अवर्षणाला तोंड देऊ शकणारे) पीक असून दुष्काळी भागात अगर अवर्षणाच्या काळात लागवडीसाठी योग्य आहे. पंजाब, उ. प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत हे पीक लागवडीत आहे .
राळा : हे बारीक दाण्याचे रुक्षताविरोधक पीक मुख्यत्वेकरून आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात लागवडीत आहे. २,००० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशांत या पिकाची लागवड होऊ शकते
बंटी : हे लवकर पिकणारे, जाडजूड, तुरा असलेले, गवतासारखे वाढणारे पीक असून ते भारताच्या निरनिराळ्या भागांत आढळते. २.००० मी. उंचीपर्यंत हिमालयातही ते वाढते. ते रुक्षताविरोधक आहे परंतु त्याचबरोबर ते पाणथळ जमिनीतही वाढते .
कोद्रा : चिवट आणि अतिशय रुक्षताविरोधक बारीक तृणधान्य. ते तमिळनाडू व उ. कर्नाटक या दोन राज्यांत बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरातच्या काही भागांत लागवडीत आहे
सावा : हे गरीबांची धान्य असून रुक्षताविरोधक तसेच पाणथळ जमिनीत वाढणारे, बारीक तृणधान्य थोड्या प्रमाणावर लागवडीत आहे

भारत हा जगातला सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश असून, आपल्या संस्कृतीप्रमाणेच तृणधान्यांमध्येही खूप वैविध्य आहे. पौष्टिक आहाराचे सेवन करण्यास प्रोत्साहन मिळेल , त्यांची उपलब्धता आणखी वाढेल आणि छोट्या शेतकर्‍यांना त्याचा खूप फायदा होईल, लहान आणि मध्यम शेतकरी बहुतेक ठिकाणी पाण्याची समस्या असलेल्या जमिनीवर भरड धान्य पिकवतात आणि जमीनही इतकी सुपीक नसते. याचा फायदा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगाला होईल.

Leave a Comment

पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करण्याचे हे आहेत फायदे ! भरड धान्य (Millets) ही काळाची गरज MAHADBT अंतर्गत अनुदानित बी-बियाणे साठी अर्ज प्रक्रिया सुरू गूळ खाण्याचे फायदे आपणास माहीत आहे का ? आंब्या सोबतच त्यांची कोय ही आहे आपल्या साठी आरोग्यदायी!