१ ) बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांवरील खर्च कमी करण्यासाठी उपाय योजना
अ ) बियाणे
- संकरित वाण वगळता सुधारित वाणांचे प्रमाणित बियाणे दरवर्षी नव्याने खरेदी न करता ३ वर्षापर्यंत वापरावे.
- ग्रामस्तरावर शेतकरी गटांच्या / उत्पादक कंपन्यांच्या मार्फत बीज उत्पादन कार्यक्रम राबवावा.
- बियाण्यांची बचत होईल अशा लागवड पद्धतीचा अवलंब करावा. उदा. भाता साठी ‘श्री’ व ‘सुगना’ भात तंत्र ( S R T ) पद्धत, तेलबिया व कडधान्यासाठी ( बी बी एफ ) यंत्राद्वारे लागवड इ.
ब ) रासायनिक खते
- जमीन आरोग्य पत्रिकेतील शिफारशीनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा.
- निमकोटेड युरिया चा वापर केल्याने पिकास योग्य प्रमाणात नत्राचा पुरवठा होऊ शकतो व नत्र वापर कार्यक्षमतेत वाढ होते. पर्यायाने नत्राच्या मात्रेत बचत होते. तसेच त्यामधील निंबोळी युक्त घटकांमुळे कीड नियंत्रणास मदत होते.
- जमिनीतील स्फुरद मुक्त होण्यासाठी स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू खतांचा (P S B ) वापर करावा.
- रासायनिक खतांच्या कार्यक्षम वापरासाठी खत देण्याच्या सुधारित पद्धतींचा अवलंब करावा उदा. युरिया + डीएपी ब्रिकेट्स बियाणे, व खत पेरणी यंत्राचा वापर.
- शेतातील वाया जाणाऱ्या काडी कचऱ्या पासून शास्त्रोक्त पद्धतीने सेंद्रिय खत तयार करून वापरावे. उदा कंपोस्ट, नाडेप ,गांडूळ खत बायोडायनामिक खत इ.
- कडधान्य व तेलबिया पिकांमध्ये जैविक खतांचा ( पावडर व द्रव रूप ) वापर केल्यास रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते.
- तुर व हरभरा पिकांवर फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत २ टक्के युरिया चे द्रावण फवारावे.
- पिकांच्या पोषणासाठी कमी खर्चात शेतावर तयार करता येईल अशी सेंद्रिय खते वापरावीत. उदा. जीवामृत, बायोगॅस स्लरी, गांडूळ खत, हिरवळीचे खत, नाडेप, कंपोस्ट खत व बायोडायनॅमिक खत इ.
- भात व भाजीपाला पिकांमध्ये युरिया व डीएपी ब्रिकेटस चा वापर करावा जेणेकरून पिकांना आवश्यक ते प्रमाणे नत्र व स्फुरद ची उपलब्धता होते
- ठिबक सिंचनाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पाण्यात विरघळणाऱ्या तसेच द्रवरूप खतांचा वापर करावा
- फवारणी द्वारे रासायनिक खतांची मात्रा देणे हे जमिनीतून द्यावयाच्या खतांपेक्षा किफायतशीर असल्याने शिफारशी प्रमाणे फवारणी द्वारे खते द्यावीत
- शून्य मशागत, पिकांचा फेरपालट, जैविक व सेंद्रिय खतांचा वापर, शेतातील काडी कचरा व पाला पाचोळा शेतातच गाडणे आणि पिकांच्या गरजेनुसार पाण्याचा वापर या बाबींचा अवलंब केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमीन सुपीक बनतात व परिणामी रासायनिक खतांची आवश्यकता भासत नाही.
क ) कीडनाशके
- कीड रोग सर्वेक्षणाच्या आधारे दिलेल्या सल्ल्यानुसारच कीटकनाशकांचा वापर करावा.
- ज्या पिकांसाठी व कीड रोगासाठी कीटकनाशके तयार केलेली आहे त्याच पिकासाठी व किड लोकांसाठी त्या कीटकनाशकांचा वापर करावा लेबल क्लेम प्रमाणे वापर करावा
- कीटकनाशकांच्या प्रभावी परिणाम करते साठी शिफारस केलेल्या कीटकनाशकांची योग्य मात्र वापरून तयार केलेले द्रावण वापरून सुधारित फवारणी यंत्राचा वापर करून फवारावे व फवारणी नंतर पंप घेऊन ठेवावा
- जमिनीतून पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी जैविक किंवा रासायनिक कीडनाशकांची बीज प्रक्रिया करावी
- किड नियंत्रणासाठी सुरुवातीस जैविक कीडनाशकांचा वापर करावा व जर किडींची तीव्रता नुकसान पातळीच्या वर गेली तरच प्रभावी रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी
- बीज प्रक्रियेसाठी शेतावर तयार करता येईल अशा सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. उदा. बिजामृत + गोमूत्र + दूध + चुना + माती+ ट्रायकोडमा इ.
- तुरी वरील शेंगा पोखरणारी अळी हरभऱ्यावरील घाटे अळी व कापसावरील रस शोषणाऱ्या किडी व बोंड अळीच्या नियंत्रणासाठी घरच्या घरी तयार केलेल्या 5 टक्के लिंबोळी अर्काची फवारणी फुलकळी अवस्थेमध्ये करावी.
- भाजीपाल्यावरील रस शोषणार्या किडींसाठी दशपर्णी अर्काची (सीताफळ + पपई + रुई + करंज + पनीर + कडूलिंबू + निरगुडी + घाणेरी + गुळवेल + एरंड) 2.5 लिटर द्रावण 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी प्रक्षेत्रावर करावी.
- फळबागांमध्ये बुरशीजन्य तसेच जिवाणूजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी शिफारस केलेल्या अवस्थेमध्ये १ टक्के बोर्ड मिश्रणाची फवारणी करावी व खोडांना १० टक्के घरच्या घरी तयार केलेली बोर्ड पेस्ट लावावी.
- फळांची छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांद्या, काड्या व पाने बागेत न ठेवता जिवाणू कल्चर चा वापर करून कंपोस्ट तयार करावे.
- सूत्र कृमींच्या नियंत्रणासाठी फळबागांमध्ये स्थानिक झेंडूचे मिश्र पीक घ्यावे.
- सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस व भाजीपाला या पिकांवरील अळ्यांच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
२ ) पाण्याची बचत करण्यासाठी उपाय योजना
- जमिनीतील ओलावा टिकण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण पद्धतीचा अवलंब करावा.
- उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार व ठिबक सिंचन सारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा पिकांसाठी शिफारशी नुसार अवलंब करावा.
- जमिनीची जलधारण क्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.
- फळ पिकांच्या बुंध्या भोवती दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सावली पडणाऱ्या क्षेत्रातील बाष्पीभवन कमी करण्यासाठी शेतातील काडीकचरा किंवा पाला पाचोळ्याचा किंवा प्लॅस्टिकचे अच्छादन करावे.
- जीराईत पिकांसाठी पावसाळ्यातील खंडाच्या काळात संरक्षित सिंचन द्यावे.
- जमिनीच्या मगदूराप्रमाणे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज बदल असल्याने त्या त्या वेळेच्या गरजे नुसार पाणी द्यावे.
- पाण्याची उपलब्धता कमी असल्यास फक्त संवेदनशील अवस्थांमध्येच पाणी दिल्यास पाण्याच्या बचती बरोबर पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत नाही.
- कमी पाण्यावर पिकांच्या लागवडी पद्धती. उदा. चारा पिकांसाठी हायड्रोपोनिक तंत्रज्ञान अवलंबावे.
- पाण्याचा ताण पडल्यास सोयाबीन, मूग, उडीद या कमी अंतरा वरील पिकांमध्ये अंतर मशागतीची कामे झाल्या नंतर प्रत्येक चार ओळी नंतर उथळ सऱ्या कराव्यात.
- फळबागांना पाण्याचा ताण पडू नये म्हणून 8% केओलिन किंवा एक ते दोन टक्के पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.
- फळबागांचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण व्हावे म्हणून बागेच्या पश्चिम व दक्षिण बाजूस शेवरी, सुरू सारख्या उंच वाढणाऱ्या वारा रोधकांची लागवड पाऊस सुरू होताच करावी.
३) मजुरीवरील खर्च कमी करण्यासाठी उपाय योजना
- यांत्रिकीकरणाच्या अवलंबामुळे मजुरीवरील पंचवीस ते पन्नास टक्के खर्च कमी होतो व पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
- पिकांच्या पूर्व मशागतीपासून ते काढणी व मळणी पर्यंतच्या प्रत्येक कामासाठी उपलब्ध असलेल्या सुधारित कृषी अवजारांचा व यंत्रांचा वापर करावा.
- यांत्रिकीकरणनाचा खर्च कमी करण्यासाठी भाडेतत्त्वावर सर्व कामे वेळेत पूर्ण करता येतील.
- तण नियंत्रणासाठी उगवणीपूर्वी व उगवणीनंतरच्या रासायनिक तणनाशकांचा वापर करावा.
- जिरायत पिकांच्या पेरणीसाठी फारच मर्यादित कालावधी मिळत असल्याने एकाच वेळी गादीवाफे तयार करणे, बियाणे पेरणे व बियाण्याच्या ठिकाणी खत देणे ही कामे करण्यासाठी रुंद वाफा सरी यंत्राचा (बी बी एफ ) वापर करावा.
- संत्रा, मोसंबी, डाळिंब, फळपिकांच्या छाटणीसाठी ट्रॅक्टरचलित छाटणी यंत्राचा वापर फळ काढणी नंतर शिफारशीनुसार करावा.
- फळबागांमधील अंतर मशागतींच्या सर्व कामांसाठी व फवारणीसाठी पावर टिलर चा वापर करावा.
- भात, ऊस, कांदा, बटाटा या पिकांच्या लागवडी साठी विविध प्रकारची लागवड यंत्रे (भात लावणी यंत्र , कांदा/ बटाटा लागवड यंत्र, शुगर केन प्लांटर) उपलब्ध असून त्यांचा वापर केल्यास मजुरीमध्ये ६० ते ८० % बचत होते.
४ ) शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी उपाय योजना
- आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास टंचाई किंवा आपत्कालीन परिस्थिती मुख्य पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला तरी आंतर पिकाच्या उत्पादनामुळे जोखीम कमी होण्यास मदत होते.
- कापूस + सोयाबीन, कापूस + मूग, कापूस + उडीद, सोयाबीन + तूर, ज्वारी + तूर, भाताच्या बांधावर तुर इ. लागवड पद्धती यशस्वी ठरल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा.
- पावसास उशिरा सुरुवात झाल्यास कमी कालावधीची पिके घ्यावी तसेच पिकांचे कमी कालावधीचे वाण वापरावे.
- जमिनीची वापसा स्थिती असल्यानंतरच पिकांची पेरणी करावी.
- कृषी विभागाच्या व कृषी विज्ञान केंद्राच्या साह्याने आपत्कालीन पीक आराखड्या नुसार पर्यायी पिकांची लागवड करावी।
- एक पिक पद्धती ऐवजी बहुपीक पद्धतीचा अवलंब करावा एका हंगामात उपलब्ध क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड करण्याऐवजी विविध पिकांचे नियोजन करून लागवड केल्यास जोखीम कमी होण्यास मदत होते. उदा. पूर्ण क्षेत्रावर कापूस किंवा सोयाबीन घेण्याऐवजी काही क्षेत्रात कडधान्य, ज्वारी, चारा पिके तसेच फळ पिकांचा ही समावेश करावा.
- एकात्मिक शेती पद्धती म्हणजे शेती व शेतीस पूरक असे जोडधंदे (फलोत्पादन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय ,रेशीम उद्योग, मत्स्य उद्योग इ.) केल्यास शेतातील जोखीम कमी होण्यास मदत होते.
- समूहाच्या गटाच्या किंवा उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतीस लागणाऱ्या निष्ठांची एकत्रित खरेदी केल्यास खर्चात बचत होते तसेच उत्पादनांची एकत्रित विक्री केल्यास देखील फायदा होतो.
- निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या संभाव्य नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घ्यावा.